राज्य सरकारचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकासकामे केली जाणार नाहीत. दिलेला शब्द पाळणे, हे आपले तत्त्व आहे, असे स्पष्ट करत, ‘आरे’मधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. यानंतर सोशल नेटवर्किंगवर दुमत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एकीकडे सरकारने हवी तेवढी झाडे तोडून झाल्याचे सर्वोच्च न्यायलयात स्पष्ट केल्यानंतर आरे येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्यात काही अर्थ नसल्याचे कारशेड बांधण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे पैसे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनमताचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या जनमत चाचणीमध्ये वाचकांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे. या जनमत चाचणीमध्ये फेसबुकवर एकूण १० हजार ३०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ७५ टक्के वाचकांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य असल्याचे म्हटलं आहे.

मेट्रो कारशेडच्या कामाचा संपूर्ण आढावा घेऊ न त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र तोवर मेट्रोच्या कामाला स्थगिती नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना या निर्णयाचा माहिती. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर आरे हा विषय सोशल नेटवर्किंगवर टॉप ट्रेण्डींग होता. या निर्णयावरुन नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. म्हणूनच वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने ट्विटर तसेच फेसबुकवर जनमत चाचणी घेतली. ‘आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य वाटतो का?,’ असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला फेसबुकवर १० हजार ३०० हून अधिक तर ट्विटवर ३ हजार ३८१ हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. यापैकी फेसबुकवर ७५ टक्के वाचकांनी तर ट्विटवरील ७० टक्के वाचकांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

फेसबुकवरील जनमत चाचणीमधील १० हजार ३०० मतदारांपैकी ७५ टक्के म्हणजेच ७ हजार ७०० हून अधिक मतदारांनी ‘होय, आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य वाटतो,’ असं मत नोंदवलं. तर २५ टक्के म्हणजेच अडीच हजार वाचकांनी नाही असं मत नोंदवत उद्धव ठाकरेंचा हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटलं आहे.

ट्विटरवरील याच जनमत चाचणीमध्ये ३ हजार ३८१ वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ७० टक्के वाचकांनी होय असं मत नोंदवत उद्धव यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर ३० टक्के वाचकांनी नाही असे उत्तर देत या निर्णय योग्य नसल्याचे म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मेट्रो कारशेडसाठी आरेतील २६४६ झाडे तोडण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधात दंड थोपटले होते. त्यावर, कारशेडसाठी दुसरा पर्याय नसल्याने आरेशिवाय कोठेही कारशेड होणार नाही अशी भूमिका राज्य सरकार आणि ‘मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन’ने घेतल्यानंतर हे प्रकरण प्रथम उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्ही न्यायालयांनी सरकारची भूमिका मान्य करीत मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे सोडण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यानंतरही आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते.

ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच पर्यावरणप्रेमींनी निदर्शने करीत आरे वाचविण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची ठाकरे यांना आठवण करून दिली. त्यामुळे आरेबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शुक्रवारी मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच लगेचच ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. ‘रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही. कोणत्याही विकासाच्या कामाला वा मेट्रोच्या कामालाही स्थगिती नाही. केवळ मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. तेथील पानही तोडता येणार नाही. त्या कामाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.