२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) खटला चालवण्याच्या निर्णयाला मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज (गुरुवारी) सुनावणी होणार होती. परंतु, न्यायमूर्ती अनुपस्थित राहिल्याने ही सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. पुरोहितसह अन्य आरोपींवर शुक्रवारीच ‘यूएपीए’अंतर्गत आरोपनिश्चिती करण्यात येणार असल्याने उच्च न्यायालय गुरुवारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामुळे पुरोहितसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी पुरोहितवर ‘यूएपीए’नुसार खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याच्या वैधतेला पुरोहित यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आव्हान दिले होते. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहितला दिलासा देण्यास नकार दिला होता. ‘यूएपीए’ खटला चालवण्यास दिलेली मंजुरी विशेष न्यायालयाने वैध ठरवली होती.

विशेष न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने शेवटी कर्नल पुरोहित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले जाणार आहेत. यापूर्वी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती पुरोहित याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. यानुसार गुरुवारी उच्च न्यायालयात पुरोहितच्या याचिकेवर सुनावणी होणार होती.