शाळेत प्रवेश मिळण्यापासूनच लहान मुलांमध्ये चढाओढीला सुरुवात होते. त्यानंतर विविध शिकवण्या, इतर विद्यार्थ्यांकडून होणारी चेष्टा, पालकांचे आपापसांतील वाद, त्यांचा घटस्फोट, इत्यादी कारणांमुळे मुलांवर ताण येतो. तो हाताळण्यासाठी मुलांना मानसिकदृष्टय़ा कणखर बनवणे आवश्यक आहे. म्हणूनच शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्त्व प्राप्त व्हावे, असा सूर मानसिक आरोग्य परिषदेत उमटला. ‘आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट’ने आयोजित केलेल्या ‘बी द चेंज’ या पहिल्यावहिल्या मानसिक आरोग्य परिषदेत पालक-शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ सहभागी झाले होते. ‘लैंगिक शिक्षण, पालकांचे मतभेद अशा विषयांवर सहजतेने चर्चा करायला मुलांना शिकवले गेले पाहिजे. त्यासाठी मानसिक आरोग्याविषयीचा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे’, असे मत ‘दि आदित्य बिर्ला इंटिग्रेटेड स्कूल’चे वैद्यकीय संचालक डॉ. झिरक मार्कर यांनी व्यक्त केले. ‘बौद्धिक विकासापेक्षा मुलांच्या भावनिक विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे’, असे आदित्य बिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका सिन्हा म्हणाल्या. ‘लहान वयापासूनच मुलांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करून, समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे’, असा सल्ला पत्रकार फेय डिसुझा यांनी दिला.