मुंबईतील एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एल्फिन्स्टनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधणार आहेत. एल्फिन्स्टनसोबतच करीरोड आणि आंबिवलीतील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत.

एल्फिन्स्टनचा पूल कमीतकमी वेळात बांधला जावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे शेलार यांनी ट्विट करुन म्हटले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसह एलफिन्स्टन पुलाची पाहणी केली. यानंतर एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले होते. यासोबतच शेलार यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे ट्विट शेलार यांनी केले होते. मोदी सरकारने अतिशय तत्परता दाखवल्याचेही शेलार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते.

आपत्कालीन स्थितीत कमीत कमी कालावधीत पूल बांधण्याचे कौशल्य लष्कराकडे आहे. भारतीय सैन्यातील इंजिनीयरिंग विंग यासाठी ओळखली जाते. २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोसळलेला पूल लष्कराने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केला होता. यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे मुंबईत पूल उभारला जाणार आहे.