देशात १०६ टक्के पावसाचा मान्सून अंदाज, मराठवाडय़ावरही वरूणकृपा

गेल्या काही वर्षांत कधी नव्हे एवढय़ा आतुरतेने ज्या मान्सूनची यावेळी वाट पाहिली जात आहे तो भरभरून दान देणार असल्याचे केंद्रीय वेधशाळेने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटले आहे. गेली दोन वर्षे दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघालेल्या मराठवाडय़ासह विदर्भातही चांगला पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने महाराष्ट्राच्या पाणीसंकटात कपात होण्याची सुचिन्हे आहेत. या वेळी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमी पावसाचा सर्वाधिक तडाखा महाराष्ट्राला बसला होता. यासाठी कारणीभूत ठरलेला एल निनोचा प्रभाव एप्रिल २०१५ पासून सुरू झाला होता तो डिसेंबपर्यंत अत्यंत तीव्र झाला होता. अजूनही प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक असले तरी एल निनोचा प्रभाव मात्र ओसरत आहे. प्रशांत महासागरासोबतच हिंदी महासागरातील तापमानाचा भारतीय मान्सूनवर अत्यंत प्रभाव पडत असतो. त्यामुळे मान्सूनमध्ये हेच दोन्ही घटक महत्त्वाचे ठरतील.  एल निनो असताना ६५ टक्के वेळा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे. मात्र एलनिनोचा प्रभाव ओसरल्यानंतरच्या वर्षांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ७१ टक्के असते. या पाश्र्वभूमीवर या वेळी १०६ टक्के पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.  या अंदाजात पाच टक्क्यांचा फरक पडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता केवळ सहा टक्के आहे तर सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता ९४ टक्के आहे. त्यातही १११ टक्के पाऊस पडण्याची शक्यता ३० टक्के वर्तविण्यात आली आहे. या वर्षी मराठवाडय़ात सरासरीपेक्षा चाळीस टक्के कमी पाऊस पडला होता. मध्य महाराष्ट्र व विदर्भातही सरासरीच्या तीस टक्के कमी पाऊस पडला. त्यामुळे मराठवाडा व विदर्भ या दुष्काळी प्रदेशातही या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

‘आयओडी’चे महत्त्व..

देशातील मान्सूनमध्ये इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) हा घटकही महत्त्वाची भूमिका बजावतो. बंगालचा उपसागर व अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरक म्हणजे ‘आयओडी’. अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अधिक असल्यास मान्सून वाऱ्यांचा प्रभाव वाढतो. मात्र सध्या तापमानात फरक नाही. मान्सूनच्या मध्यावर अरबी समुद्रावरील तापमान अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे.

शेतीला दिलासा.. गेली दोन वर्षे दुष्काळी स्थितीमुळे शेती धोक्यात आहे. देशांतर्गत उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा १५ टक्के असून ६० टक्के लोक त्यावर अवलंबून आहेत. मात्र ४० टक्के जमीन सिंचनाखाली असल्याने मान्सूनवरच शेती अवलंबून आहे. या अंदाजाने शेतकरी सुखावले आहेत.

मान्सूनच्या अंदाजासाठीचे निकष

  • उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागरांच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरक
  • हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान. पूर्व आशियातील समुद्र पृष्ठभागाचा सरासरी दाब
  • वायव्य युरोपच्या जमिनीनजीकचे तापमान.प्रशांत महासागरातील उष्ण जलसाठ