इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार झाल्याचे उघड; तीन दिवसांत २३० रिक्षांवर कारवाई रिक्षाला बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करून ते वेगवान करण्याचे प्रकार मुंबईत वाढले असून याद्वारे प्रवाशांकडून जादा पैसे उकळण्यात येत आहेत. सात दिवसांपूर्वी एका रिक्षामधील इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाल्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने गेल्या तीन दिवसांत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत मीटरमध्ये फेरफार करण्यात आलेल्या २३० रिक्षा आढळल्या असून अशा रिक्षांची कागदपत्रे व चालकाचा परवाना जप्त करण्यात आला आहे. ठाण्यातील कापूरबावडी येथून जोगेश्वरी येथे निघालेले सचिन खेतले यांनी रिक्षा पकडली. नेहमी याच मार्गावर ये-जा करत असल्याने ३०० रुपये भाडे होत असल्याचे त्यांना माहीत होते. मात्र, या रिक्षाचे भाडे ३६० रुपये इतके आले. याबाबत खेतले यांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली. तपासणीअंती या मीटरमध्ये फेरफार झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पूर्वीच्या काळातील मीटरमध्ये फेरफार होत असल्याने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती करण्यात आली होती. त्या वेळी या मीटरमध्ये फेरफार करण्यात येणार नाहीत, असेही सांगण्यात येत होते. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. इलेक्ट्रॉनिक मीटरमधील फेरफाराची एक घटना उघडकीस आल्यानंतर जागे झालेल्या परिवहन आयुक्त कार्यालयाने त्याविरोधात रविवारपासून मोहीमच उघडली आहे. यासाठी विशेष पथकही नेमण्यात आले आहे. वांद्रे ते दहिसपर्यंत एक हजार ३० रिक्षांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २३० रिक्षा दोषी आढळल्या. मीटरचे सील तोडून त्यात फेरफार आले असून भाडे जलद गतीने करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राजेंद्र मदने (परिवहन उपायुक्त, अंमलबजावणी) यांनी २३० रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार झाल्याचे सांगितले. त्यांची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचेही ते म्हणाले. जप्तीच्या वाहनांसाठी जागेची मारामार एखाद्या वाहनावर जप्तीची कारवाईही आरटीओकडून करण्यात येते. जप्त केलेली वाहने कुर्ला एसटी आगाराच्या हद्दीत ठेवली जातात. मात्र आता क्षमताच नसल्याने जप्त वाहने ठेवणार कुठे, असा सवाल परिवहन आयुक्त कार्यालयासमोर आहे. त्यामुळे वाहनांवर जप्तीच्या कारवाईपेक्षा त्यांची कागदपत्र जप्तीची कारवाईच केली जाते. हीच कारवाई सध्या मुंबईत करण्यात आलेल्या रिक्षांवर केली आहे. मदने यांनी वाहनांवर जप्तीची कारवाई केल्यानंतर ती वाहने ठेवण्यासाठी वांद्रे, परेल, अंधेरी, बोरिवली, दहिसर येथे जागेचा शोध सुरू असल्याचे सांगितले. जागा उपलब्ध होताच रिक्षा जप्तीचीही कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.