– शिवराज यादव

ए दिल है मुश्किल जिना यहाँ….जॉनी वॉकर यांच्या गाण्याची ही सुरुवात सध्याच्या मुंबईतील परिस्थितीला अगदी योग्य आहे. मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर, आर्थिक राजधानी, झगमगाट हे सगळं आता थापा वाटू लागाव्यात अशी परिस्थिती झाली आहे. आम्ही ज्या मुंबईला ओळखतो ती ही मुंबई नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत होत असलेल्या घटना पाहिल्यानंतर एक मुंबईकर म्हणून मला आता या मुंबईची आणि माझ्यासारख्या मुंबईकरांची चिंता वाटू लागली आहे. मला स्वप्न दाखवणारी ही मुंबई कधी माझं स्वप्न एका क्षणात नाहीसं करेल अशी भीती मला क्षणाक्षणाला वाटू लागली आहे. कधी कोणी मुंबईला काही बोललं की त्याला सडेतोड उत्तर देणारे आम्ही आता आपलंच नाणं तपासून पाहत आहोत.

आतापर्यंत एखाद्या नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादी हल्ल्यात जीव जाईल अशी भीती वाटणाऱ्या मुंबईत रस्त्यावर चालताना पुढच्या सेकंदाला जिवंत असू की नाही याची शाश्वतीही देऊ शकत नाही अशी परिस्थिती झालीये. अंधेरीला पूल कोसळला आणि पुन्हा एकदा मुंबईने आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय याची जाणीव करुन दिलीये. म्हणजे ज्या मुंबईत रस्त्यांवर अपघात होतात, लोकलच्या गर्दीतून पडून एखाद्याचा मृत्यू होतो तिथे अक्षरक्ष: एक विमानही पडेल अशी कल्पना कोणी स्वप्नातही केली नसावी.

सोशल मीडियावर एक जोक सध्या व्हायरल होतोय की, नेमकं खाली बघून चालायचं, आजूबाजूला की वरती बघून. पण खरं सांगू का हे काही खोटं नाहीये. मुंबईत खरंच अशी परिस्थिती निर्माण झालीये. म्हणजे अंधेरीत कोसळलेला पूल, घाटकोपरमध्ये कोसळलेलं चार्टर्ड विमान, वांद्रे येथे समुद्रात बुडालेलं फ्लोटिंग हॉटेल, धारावीत कारने लोकांना चिरडल्याचं प्रकरण, मरिन लाईन्सला खचलेला रस्ता आणि वडाळ्यात खचलेली जमीन ही मुंबई किती धोकादायक झाली आहे याची ताजी उदाहरणं आहेत. कमला मिलमध्ये लागलेली भीषण आग आणि एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी या घटनाही किती भयानक होत्या हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या सगळ्या घटना मुंबईची क्षमता संपली असल्याचं ओरडून सांगत आहेत.

आता तुम्ही म्हणाल परराज्यातील लोंढेच याला कारणीभूत आहेत किंवा प्रशासन याला जबाबदार आहे. कारणं काहीही असली तरी मुंबई आता हादसो का शहर झालं आहे यात काही दुमत नाही. उद्या मुंबईत मेट्रो येईल, बुलेट ट्रेनही सुरु होतील पण यामुळे मुंबई राहण्यासाठी सुरक्षित होईल याची शाश्वती कोण देणार…एक मुंबईकर म्हणून मुंबईची अशाप्रकारे होत असलेला वाताहत पाहणं फारच कठीण जातं, पण सत्य स्विकारलं नाही तर हेच शहर स्वप्नाप्रमाणे आपल्यालाही कधी गिळेल माहित नाही. कालपर्यंत ज्या शहरात मध्यरात्रीदेखील निर्धास्तपणे फिरता येत होतं, ते शहर आता मला भीती दाखवू पाहतंय. नेहमी ‘ये मुंबई मेरी जान’ म्हणणाऱ्या मुंबईकराच्या मनात आता एकच भीती असते ‘ये मुंबई ना ले ले मेरी जान’.