बारावीत शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुलुंडच्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावरील विजय नगर येथे घडली. नम्रता गवळी (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती वाणी महाविद्यालयात शिकत होती. पूर्वपरीक्षेत एका विषयात अनुत्तीर्ण झाल्याने नैराश्यामुळे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आत्महत्या केल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.
हार्बरवर गोंधळ
मुंबई: हार्बर मार्गावर मात्र जुनाट गाडय़ांमुळे सावळा गोंधळ सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईहून पनवेलला जाणारी लोकल कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर संध्याकाळी ४ वाजता बंद पडली. या लोकलच्या डब्यात बिघाड झाल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. साडेचारच्या सुमारा एक इंजिन आले आणि ही लोकल बाजूला नेण्यात आली. या दरम्यान पाच सेवा रद्द करण्यात आल्या. अखेर सायंकाळी ४.५० वाजता ही गाडी बाजूला झाल्यावर मार्ग सुरळीत झाला.
अपहृत मुलगी सापडली
ठाणे: भिवंडीतील सरोज कुटुंबियांची अपहृत मुलगी(वय ५) ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या प्रयत्नामुळे दुसऱ्याच दिवशी सापडली आहे. भिवंडी येथील न्यू टावरे कंपाऊंड परिसरातील कपिलदेव सरोज (२८) यांची मुलगी रोली हिचे (५) घरासमोर खेळत असताना मोटारसायकवरून आलेल्या एकाने अपहरण केले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू केला. पोलीस अधिकारी कमालउद्दीन शेख यांच्या पथकाने माग काढत कारवार गावातून   रोलीला ताब्यात घेतले.