मुंबईत शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गेल्या १५ वर्षातील सर्वांत निचांकी ध्वनीप्रदुषण नोंदवलं गेलं आहे. यंदाच्या करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषण रोखण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास प्रतिबंध केला होता. त्याचाच परिणाम म्हणून यंदा फटाक्यांच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची सर्वात निचांकी नोंद झाली आहे. आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने याबाबत अहवाल तयार केला आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिलं आहे.

आवाज फाउंडेशनचे सुमैरा अब्दुलली म्हणाल्या, “यंदाच्या दिवाळीत मुंबई महापालिकेने फटाके उडवण्याबाबत कडक निर्बंध घातल्यानेच कमी डेसिबलची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये ध्वनी प्रदुषणाबाबत जागृती होत असल्याचे एक यामागे प्रमुख कारण आहे.” आवाज फाउंडेशनच्या माहितीनुसार, शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंतच्या शहरातील आवाजाची पातळी मोजण्यात आली. त्यानुसार, फटाके वाजण्याच्या वेळमर्यादेपर्यंत म्हणजेच रात्री १० वाजेपर्यंत शहरातील शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात १०५.५ डेसिबल ध्वनीची नोंद झाली. दरम्यान, यापूर्वी मुंबईत दिवाळीच्या दिवशी २०१९ मध्ये याची ११२.३ डेसिबल, २०१८मध्ये ११४.१ डेसिबल, २०१७ मध्ये ११७.८ डेसिबल ध्वनीची नोंद झाली होती.

त्याचबरोबर मुंबईत तंतोतंत ध्वनी प्रदुषण मोजणं हे कठीण काम असल्याचं आवाज फाउंडेशनचं म्हणणं आहे. यंदा आवाजाची तीव्रता कमी असली तरी बॉम्ब आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचे शहरात आवाज ऐकू येत होते. पण सोसायट्यांमधील फटाक्यांच्या आवाजाची नोंद घेणे शक्य होत नाही.

करोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे ध्वनी आणि हवा प्रदुषण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेनं शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास मनाई केली होती. केवळ छोटे फटाके, अनार, फुलबाजा हेच फटाके उडवण्याचे आवाहनही पालिकेने नागरिकांना केलं होतं.