जखमी झालेल्या घारीवर उपचार करुन पक्षीप्रेमींनी तिला पुन्हा उरणच्या जंगलात सोडून जीवदान दिलं. पण, आपल्याला जीवदान देणा-यासोबत या घारीला चांगलाच लळा लागला आहे. नवी मुंबईतील ही घटना आहे. साधारण महिन्याभरापूर्वी पक्षीप्रेमी राजेश नागवेकर यांच्याकडे उरणच्या डोंगरी गावातून एक फोन आला. जखमी अवस्थेत एक घार पडली असून तिला उडता येत नाहीये असं त्यांना सांगण्यात आलं. राजेश यांनी वन अधिका-यांना याबाबत माहिती दिली आणि त्या गावात पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी त्या घारीवर स्वतःच्या घरात प्राथमिक उपचार सुरू केले आणि अवघ्या दोन दिवसातच त्या घारीची प्रकृती सुधारली. तिची प्रकृती ठणठणीत झाल्याचं लक्षात आल्यावर राजेश यांनी घारीला जवळच्याच जंगलात सोडून दिलं. तो पर्यंत ही घर परिसरात चांगलीच ओळखीची झाली होती आणि लोकांनी 'बायो' असं तिचं नामकरणही केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलंय. विशेष म्हणजे या घारीला सोडून दिल्यानंतर काही तासांमध्येच ही घार राजेश यांच्या घरी परतली त्यामुळे सगळेच अवाक झाले. त्यामुळे राजेश यांच्या कुटुंबियांनी तिला काही खायला दिलं , खाऊन झाल्यावर घार उडाली. पण तेव्हापासून ही घार रोज आपल्या घरी येते आणि आम्ही तिला काहीतरी खायला देत असतो. आमच्या शेजारच्यांनाही आता हे सवयीचं झालं असून तेही तिला बायो असा आवाज देतात असं राजेश यांनी सांगितलं. गेल्या महिन्याभरापासून घारीचा हा दिनक्रम आजही सुरुच आहे. त्यामुळे आजही या घारीला पक्षीमित्र नागवेकर खायला घालतात. आणि ही घारही त्यांच्याच हातचे अन्न आवडीने खाते.