शरद पवारांकडून नेत्यांची तातडीची बैठक
दुष्काळाच्या प्रश्नावर जनतेत असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्यावर राष्ट्रवादीने भर दिला असून, या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.
दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, मार्चअखेरीस हा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारविरोधी वातावरण तयार केले जाणार आहे. दुष्काळ तसेच आगामी निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेतेमंडळींची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.