सरकारी राजपत्रात नाव व धर्म बदलासाठी तसेच वयातील चूक दुरुस्त करण्यासाठी आता लांबच लांब रांग लावण्याची गरज नसून हे काम आता घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहे. त्यामुळे लाखो नागरिकांची रांगेत तासनतास ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून मुक्तता झाली आहे. संचालनालय दर आठवडय़ाला गुरुवारी सरकारी जाहिरात म्हणजे राजपत्र प्रकाशित करीत असते. ज्यांना आपल्या नावात वा धर्मातला बदल तसेच वयाची अचूक माहिती जाहीर करावयाची आहे त्यांना या राजपत्रात जाहिरात द्यावी लागते. सध्या ही जाहिरात संचालनालयाच्या चर्नीरोड येथील मध्यवर्ती छपाई केंद्रात अथवा इतर विभागीय केंद्रांमध्ये अर्ज भरून दिल्यानंतरच देता येत होती. जाहिरातीसाठी अर्ज, शुल्क भरणे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजपत्र मिळविणे ही सर्व प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक होती.संचालनालयाच्या चर्नीरोड येथील केंद्रामध्ये २०१३मध्ये तब्बल १ लाख ८६ नागरिकांनी जाहिरातीसाठी अर्ज केला होता. या सगळ्याचा येथील यंत्रणेवर मोठा ताण येत असे. या शिवाय इथल्या केंद्राकडे ही गर्दी सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा आणि कर्मचारीही नव्हते. म्हणून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार होता. वर्षभरापूर्वी या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यावर सरकारने शिक्कामोर्तब केल्याने १० जूनपासून येथील कार्यालयाने अर्ज भरून घेण्याची पारंपरिक प्रक्रिया बंद केली.आपण दिलेली जाहिरात प्रसिद्ध झालेले राजपत्र हातात पडायला सध्या तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. पण, ऑनलाइन सेवेमुळे अर्जदारांना घर किंवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर एका आठवडय़ाच्या आत जाहिरातीचे प्रिंटआऊट घेता येईल.मुद्रण संचालनालयाकडून छापले जाणारे कायदे, अधिनियम, सरकारी प्रकाशने आदी ३२ प्रकारच्या सेवाही ऑनलाइन पुरविण्याचा विचार आहे.खेडय़ापाडय़ातून शहरातील आमच्या केंद्रावर याव्या लागणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा सर्वाधिक फायदा झाला आहे. सरकारच्या कॉमन सव्र्हिस सेंटरवर (सीएससी) देखील अर्ज भरता येणार असून राज्यभरात अशी सुमारे चार हजार केंद्रे आहेत. त्यामुळे, आधीच्या तुलनेत अर्ज भरणे खूपच सोपे झाले आहे.- परशुराम गोसावी, संचालक, मुद्रण संचालनालय