मान्सून लवकर परतत असल्याने शेती आणि पिण्याचे पाणी यासोबत इतरही दुष्परिणाम अनुभवायला मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये देशातील बहुतांश भागांत तापमान चार ते पाच अंश सेल्अिसने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीट सप्टेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात यापूर्वीच कमाल तापमानात वाढ झाली असून पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर येथील तापमान सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश से.वर गेले आहे. पावसामुळे तापमानावर नियंत्रण राहते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून देशभरातून परतला की तापमान वाढण्यास सुरुवात होते. नोव्हेंबरच्या मध्यावर पश्चिमी थंड वाऱ्यांची सुरुवात होईपर्यंत तापमापकातील पारा वाढलेला असतो. या वेळी मात्र मान्सूनच्या लवकर होत असलेल्या गच्छंतीनंतर उन्हाच्या झळांचे आगमनही लवकर होण्याची शक्यता आहे.