वाहनाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर अशा वाहन क्रमांक पाटय़ा  (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) नव्या वाहनांबरोबर आता जुन्या वाहनांनाही लावण्यात येणार आहेत. बारकोड, होलोग्राम असलेल्या या पाटय़ा जुन्या वाहनांनाही बसवण्याची तयारी परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनचालकांनाही येत्या काळात क्रमांक पाटय़ा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर असलेल्या क्रमांक पाटय़ा बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादकांनी किंवा वितरकांनी नव्या वाहनांना बारकोड, होलोग्राम असलेल्या पाटय़ा बसवून देणे बंधनकारक  करण्यात आले. १ एप्रिल २०१९ पासून नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. १ एप्रिलनंतरच्या वाहनांना नव्या पद्धतीच्या क्रमांक पाटय़ा नसल्यास वाहन नोंदणी न करण्याची सूचना राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. आता नव्या वाहनांबरोबरच एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी पाटी कायमस्वरूपी

पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहनांच्या क्रमांक असलेल्या पाटय़ा किंवा क्रमांक बदलण्यात येतात. त्यामुळे क्रमांक बदलल्यामुळे अनेकदा वाहन सापडत नाही आणि चोर पकडणे अशक्य होते. नव्या पद्धतीची पाटी ही अ‍ॅल्युमिनियमची असून ती वाहनाला कायमस्वरूपी लावण्यात आल्याने बदलली जाऊ शकत नाही. नवीन पाटी ही बदललेल्या जागीच लावू शकतो.

नव्या पद्धतीच्या पाटीची वैशिष्टय़े

 

* सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना लावण्यात येणाऱ्या पाटय़ांवरील क्रमांक ‘हॉट स्टॅम्पिंग’द्वारे टाकण्यात येतो.

* बारकोड आणि थ्रीडी होलोग्रामचाही या पाटय़ांवर समावेश असतो.

* संबंधित बारकोड आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी स्कॅन केल्यास त्यांना वाहनांबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते

* बारकोड केंद्रीय मंत्रालयाच्या वाहन प्रणालीशीही जोडलेला असतो

* ही पाटी वाहनाला कायमस्वरूपी बसवलेली असेल. त्याची नक्कलही कुणी करू शकणार नाही.

नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू..

जुन्या वाहनांनाही नव्या पद्धतीच्या क्रमांक पाटय़ा लागू करण्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सर्वच जुन्या वाहनांच्या पाटय़ा एकदम बदलल्यास गोंधळ उडण्याची शक्यता असल्याले टप्पटप्प्यांने ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथम चार चाकी वाहने, त्यानंतर दुचाकी आणि त्यानंतर अन्य जुन्या वाहनांच्या पाटय़ा बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही प्रक्रि या सुरू होण्यास नोव्हेंबर किंवा डिसेंबर उजाडेल.