भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकार व प्रशासन सज्ज झाले आहे. दरवर्षीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे नियोजन करावे आणि अनुयायांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याची सूचना शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठक झाली. राज्य सरकार, पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट यांनी केलेल्या तयारीबाबत या वेळी चर्चा झाली. चैत्यभूमी, अशोक स्तंभ, भीमज्योत यासह संपूर्ण परिसराची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांना ६ डिसेंबर रोजी सरकारी मानवंदना देण्यात येणार असून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी अधिकाऱ्यांनी दिली. आमदार आदित्य ठाकरे, आमदार भाई गिरकर, माजी आमदार सचिन अहिर, अर्जुन डांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सिद्धार्थ कासारे, रवी गरुड,विविध विभागाचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या वतीने शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेची संख्या ५० हजारांवरून दीड लाख करावी. जेणेकरून सर्व अनुयायांना ती सुलभपणे मिळू शकेल, असे देसाई यांनी सांगितले. विविध संस्था, संघटनांतर्फे शिवाजी पार्कवर देण्यात येणाऱ्या अन्नदानाचा दर्जा चांगला असावा व ते सुरक्षित असेल, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी सूचना देसाई यांनी केली.

पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा

राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे निवासासाठी मंडप टाकण्यात येत आहे. तसेच येथे एलईडी स्क्रीन, भोजन मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी १६ टँकर व ३८० नळांची व्यवस्था, १८ मोबाइल शौचालय व १२० फायबर शौचालये, २६० स्नानगृह, परिसरात विद्युत दिव्यांची सोय, समुद्रकिनाऱ्यावर ४८ जीवरक्षकांची नेमणूक, मंडपामध्ये ३०० मोबाइल चार्जिग पॉइंट आदी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात तीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून ११ रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.आरोग्य तपासणी व औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. पोलीस दलाच्या वतीने परिसरात योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच १०० सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून, शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.