रेल्वे स्थानक येण्याआधीच गाडी थांबवून उतरण्याचा प्रयत्न; गेल्या १० ते १२ दिवसांत साखळी खेचण्याच्या ६३ घटना

मुंबई : गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा येथून मेल-एक्स्प्रेसने मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी करोना चाचणी टाळण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. ज्या स्थानकात करोना चाचणी होते आहे, त्या स्थानक येण्याआधीच उतरण्यासाठी एक्स्प्रेस गाडय़ांमधील आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबविली जात आहे. गेल्या दहा-बारा दिवसांत साखळी खेचून गाडी थांबवण्याचे प्रकार वाढले असून अशा ६३ घटना उघडकीस आल्या आहेत.

चार राज्यांतून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही करोना चाचणीचा अहवाल बाळगणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ९६ तास आधी करोना चाचणी किंवा राज्यातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यावर प्रवाशांची तपासणी हा नियम आहे. रेल्वे आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांची प्रतिजन चाचणी के ली जाते. हे काम त्या त्या महापालिकांकडून सुरू आहे. करोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास प्रवाशाची करोना केंद्रात रवानगी करण्यात येते. मात्र ही चाचणी टाळण्यासाठी काही प्रवासी मेल-एक्स्प्रेस गाडय़ा संबंधित चाचणी कें द्र  असलेल्या थांब्यावर न उतरता आधीच गाडी थांबवून उतरत आहेत. यासाठी गाडय़ांच्या डब्यांमध्ये असलेली आपत्कालीन साखळी खेचली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर गेल्या दहा ते बारा दिवसांत नियोजित स्थानक येण्याआधीच साखळी खेचून गाडी थांबवण्याच्या ६३ घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक ३६ घटना पश्चिम रेल्वेवरील आहेत. गुजरात, दिल्ली, राजस्थान येथून मोठय़ा संख्येने प्रवासी पश्चिम रेल्वेच्या बोरिवली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर उतरतात. यात सर्वाधिक नऊ घटना बोरिवली स्थानकाजवळ, वापी स्थानकाजवळ तीन, मुंबई सेन्ट्रल स्थानकाजवळ चार, बोईसर आणि पालघर स्थानकाजवळ प्रत्येकी चार घटना, वसई स्थानकाजवळ दोन आणि मुंबईबाहेर सुरत स्थानकाजवळही आठ घटना घडल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही प्रवासी नियोजित स्थानक येण्याआधीच उतरून जात असल्याचे सुरक्षा दलाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे करोना चाचणी टाळण्यासाठीच साखळी खेचण्याचा प्रकार केला जात असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यापाठोपाठ मध्य रेल्वेवरही २७ घटना साखळी खेचण्याच्या घडल्या आहेत. या घटना ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, कसाराजवळ घडल्या आहेत.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांना विचारले असता, साखळी खेचून रेल्वेगाडी थांबवण्याचे प्रकार वाढल्याचे त्यांनी मान्य केले. ज्या स्थानकात चार राज्यांतून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा आहे, त्या स्थानकात करोना चाचणी होत आहे. ती टाळण्यासाठी साखळी खेचण्याचे प्रकार होत असल्याचा अंदाज आहे. परंतु हेच प्रमुख कारण आहे की अन्य कारणे हे सांगता येणे कठीण असल्याचे ते म्हणाले.