मुंबईतील मानखुर्दमध्ये शौचालयाची जमीन खचल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.  हरीश टिकेकर आणि गणेश सोनी अशी दोघा मृत्यांची नावे असून तिस-याची ओळख  अद्याप पटलेली नाही. या घटनेने शौचालयाच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या घटनेची चौकशी सुरु आहे.

मानखुर्दमधील इंदिरानगरमध्ये म्हाडाच्या वतीने शौचालय बांधण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी  साडेआठच्या समुारास परिसरातील नागरिक सार्वजनिक शौचालयात प्रात:विधीसाठी गेले असतानाच अचानक टाकीचा स्लॅब खाली कोसळल्याने तिघेजण त्यात अडकून पडले. ग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या  तिघांनाही बाहेर काढले त्यांना राजवाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या शौचालयाची देखभाल भारती फाऊंडेशन या संस्थेतर्फे केली जात होती. शौचालय मोडकळीस आल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली हेाती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरु आहे.