महाराष्ट्रातील नेतेमंडळी म्हटली की त्यांचे पांढरे शुभ्र कपडे पहिले सामान्यांच्या डोळ्यासमोर चटकन येतात. महाराष्ट्रातील राजकारणी मंडळी ही कायम त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चांमध्ये असतात. परंतु, महाराष्ट्रातील एक नेता असाही आहे जो रंगीबेरंगी कपड्यांमुळे आणि कवितांमुळे चर्चेत असतो. ते नेते म्हणजे आरपीआय(इं)चे अध्यक्ष आणि केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. रामदास आठवले यांचा आज वाढदिवस. त्यांनी आज ६२व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. "बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी | बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी || पण आज दिवस आहे जल्लोषाचा | कारण वाढदिवस आहे भारी कवीचा || युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग | आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग || आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!", अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या आधी आठवले यांना करोनाची लागण झालेली असतानादेखील अनिल देशमुख यांनी आठवले लवकर ठणठणीत व्हावे म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. त्यावेळीही देशमुख यांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “करोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा,” असं म्हणत अनिल देशमुख यांनी आठवले यांच्याच शैलीत त्यांना सदिच्छा दिल्या होत्या.