मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ दिवंगत साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रुपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मतकरी यांच्या नावाची शिफारस टाळेबंदीपूर्वीच केली होती. मात्र, पुरस्काराची घोषणा होण्याआधी टाळेबंदी सुरू झाली आणि दरम्यान मतकरी यांचे निधनही झाले. मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाटय़, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार आणि सातत्यपूर्ण लेखन केले. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, तीस वर्षे पदरमोड करुन बालनाटय़ांची निर्मिती केली. मतकरी यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन करण्यात आला आहे. ‘संगीत नाटक अकादमी’ आणि ‘साहित्य अकादमी’ या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो. ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ यापूर्वी विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी, बाबा पार्सेकर आणि जयंत सावरकर यांना प्रदान करण्यात आला आहे.