भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये मुंबईचाही समावेश आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंर मुंबई मेट्रो १ कडून सर्व १२ स्थानकांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई मेट्रोकडून ही माहिती देण्यात आली असून सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकंही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत अशीही माहिती समोर आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 10:32 am