अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं खासदार आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. यासाठी आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. गायक आनंद शिंदे यांनी अयोध्येत बौद्धविहार करण्याची मागणी केली आहे. रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“आनंद शिंदे प्रसिद्ध गायक असून माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. आनंद शिंदेनी अयोध्येत बौद्धविहार उभारण्याची मागणी केली आहे. मी गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने ही मागणी करत आहे. अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरु आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन ३० एकर जागा खरेदी करणार,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

रामदास आठवले यांनी आपण स्वत: मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. “राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर मी जमीन पाहण्यासाठी जाणार आहे. चांगली जागा घेऊन तिथे बौद्धविहार बांधण्याचा माझा प्रयत्न आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

“आनंद शिंदे यांनी यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. सगळ्या नेत्यांना एकत्र करणं हा राजकीय विषय आहे. मी तर प्रयत्न करणार आहे. सगळ्या नेत्यांना एकत्र आणून वेळ खर्च करण्यापेक्षा मी स्वत: यामध्ये लक्ष घालणार आहे. आनंद शिंदे आवाहन करत आहेत त्याप्रमाणे सगळे नेते काही एकत्र येणार नसून मी काही त्यासाठी प्रयत्न करणार नाही. ज्यांना पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी द्यावा. पण मी जबाबदारी म्हणून प्रयत्न करणार असून अयोध्येत एक सुंदर बौद्धविहार उभारल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.