महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची  दुसरी यादी राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

आतापर्यंत एक लाख ४२ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्त्वावरील यादी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात १५ जिल्ह्य़ांत पुर्णाशाने तर ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने १३ जिल्ह्य़ात अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

कर्जमुक्ती योजनेतील अपेक्षित अशा ३६ लाख ४५ हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर ३४ लाख ९८ हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.