शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

विवाह समारंभ आणि त्याच्याशी संबंधित अन्य कार्यक्रम, अंत्यविधीसंबंधिक कार्यक्रम, सहकारी संस्था, कंपन्या संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाच्या कार्यक्रमांना यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मोर्चा काढणं, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमणं, जमाव करून फटाके फोडणे, सांगितीय बँड याला प्रतिबंध करण्यात आला आहे. ९ मार्च पर्यंत बृहन्मुंबई हद्दीत हे आदेश लागू राहणार आहेत.

चित्रपटगृह, नाट्यगृहांना वगळलं
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणं, न्यायालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावाला या आदेशातून वगळण्यात आलं आहे.