मोदी-पवारांचा मंत्र! ‘एकमेका सा करू, अवघे धरू सुपंथ’ हे सहकार चळवळीचे ब्रीदवाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत लागू पडते. या दोन नेत्यांच्या मैत्रीमुळे राज्यात राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात कितीही ओरड केली तरी जनता यावर विश्वास ठेवणे कठीण जाणार आहे. ‘शेतीतील काही गोष्टी पवार यांनी मला बोट धरून शिकविल्या’ हे मोदी यांचे वक्तव्य तर ‘मोदी यांच्या कामाचा उरक बघून देशाप्रति असलेल्या समर्पित वृत्तीची जाणीव होते’ ही पवारांची स्तुतिसुमने बघितल्यावर भाजप आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व किती जवळ आहे हे स्पष्टच होते. बारामतीपाठोपाठ पुण्यात मोदी यांनी पवारांचे कोडकौतुक केल्याने राज्यातील जनतेत जायचा तो संदेश गेला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये साटेलोटे आहे, या टीकेला या उभय नेत्यांच्या वक्तव्यांनी पुष्टीच मिळाली आहे. केंद्रात यूपीए सरकार सत्तेत असताना पवारांनी आपल्याला वेळोवेळी मदत केली होती याची कबुली मोदी यांनी बारामतीपाठोपाठ पुण्यात देऊन आता पवारांना मदत करणार असल्याचे संकेतच मोदी यांनी दिले. मदतीची परतफेड कशी करणार हे गुलदस्त्यात आहे. पण अजित पवार किंवा सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या डोक्यावरील चौकशीचा भार हलका होईल का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची केलेली घोषणा किंवा अगदी चारच दिवसांपूर्वी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे पवारांचे ट्वीट यावरून राष्ट्रवादीला भाजप किती जवळचा आहे हे स्पष्टच होते. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते परस्परांवर चिखलफेक करतात. भाजप सरकारवर राष्ट्रवादीच्या वतीने आरोप किंवा टीकाटिप्पणी केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीची सहकारातील मक्तेदारी मोडीत काढण्याकरिता पावले उचलली होती. राज्यातील भाजप सरकारची राष्ट्रवादीबद्दलची भूमिका काय राहणार याकडे जनतेचे लक्ष राहणार आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर आरोप वा टीकाटिप्पणी केली तरी जनता ते गांभीर्याने घेण्याबाबत राष्ट्रवादीच्या एका नेत्याने साशंकता व्यक्त केली. नेतेमंडळींच्या स्तुतिसुमनांमुळे राष्ट्रवादीचेच जास्त नुकसान होऊ शकते. विरोधी पक्षाची जागा भरून काढण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील याबाबतही साशंकता आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या निर्णयावरून बरीच टीका सुरू झाली आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात त्याचे पडसाद उमटणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विरोधकांची मोट बांधण्याकरिता पुढाकार घेतला आहे. विरोधकांमध्ये फूट पाडण्याकरिता भाजपचे प्रयत्न आहेत. अशा वेळी सर्व पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध असणारे शरद पवार हे मोदी यांच्यासाठी उपयोगी पडू शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध सध्या ताणले गेले आहेत. विधान परिषद निवडणुकीत आघाडी करण्यास काँग्रेसने ठाम नकार दिला. मोदी आणि पवार यांच्यातील मधुर संबंधांमुळे राहुल गांधी भविष्यात राष्ट्रवादीशी जुळवून घेणे कठीण असल्याचा सूर काँग्रेसमध्ये आहे.