राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दहशतवाद पोसत आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप आणि शिवसेनेने जोरदार प्रहार करीत शिंदे यांचा निषेध केला.
असे बेताल वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्रास लाजेने मान खाली घालावयास लावले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली, तर भाजपवर हिंदू दहशतवादाचा आरोप करणाऱ्या शिंदे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे द्यावेत आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करावीच, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी  दिले.
दहशतवादाला धर्म नसतो, पण शिंदे यांनी मात्र दहशतवादावर भगवा रंग चढविला, त्यामुळे मला त्यांची कीव येते, अशी खिल्लीही तावडे यांनी उडविली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवे चैतन्य मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला, तर राहुल यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला जनताभिमुख पक्ष बनविण्याच्या सोनिया गांधी यांच्या संकल्पास नवे बळ मिळेल, असे प्रदेश काँग्रेसचे संजय दत्त म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर मात्र संजय दत्त यांनी मौन पाळले.