अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार असून सध्या संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार की नाही हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

“अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर कऱण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजेच सरकारचे १०० दिवस झाल्यावरही गेले होते,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला -संजय राऊत

“देशाच्या, हिंदुत्त्वाच्या दृष्टीने भूमिपूजनाचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. करोनाच संकट नसतं तर लाखो रामभक्त तिथे आले असते. पण करोनामुळे निमंत्रण देण्यावर बंधनं असून मला मिळालेल्या माहितीप्रमाण १५० लोकांना बोलावण्यात येणार आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.