गुढीपाडव्यानिमित्त तोंड गोड करण्यासाठी खवय्ये अजूनही श्रीखंडालाच पसंती देत असून मुंबईतील सुप्रसिद्ध मिठाईच्या दुकानांमध्ये प्रथम श्रीखंडाला नंतर बासुंदी, जिलेबी, पेढे आदींना मागणी आहे. पारंपरिक चक्का व श्रीखंड विकत घेण्यासाठी नागरिक गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासूनच मुंबईतील प्रसिद्ध दुकानांमध्ये हजेरी लावत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी मिठाई चालकांनीदेखील मोठय़ा प्रमाणात श्रीखंड व अन्य गोड-धोड पदार्थाची निर्मिती केली असून मुंबईतील मिठाईच्या सुप्रसिद्ध दुकानांमधून प्रत्येकी शंभर किलोच्यावर श्रीखंड संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नववर्षांचे आगमन म्हणून गुढीपाडवा हा मिष्टान्नाच्या गोड चवीने अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये साजरा केला जातो. अनेक जण या सणाचा गोडवा श्रीखंड-पुरीच्या पारंपरिक बेतानेच अनुभवतात. यात अनेक जण आजही श्रीखंडाला पसंती देताना दिसतात. त्यामुळे, मिठाई विक्रेत्यांनीदेखील श्रीखंडाचे वेगवेगळे प्रकार या पाडव्यानिमित्त बाजारात आणले आहेत. यात श्रीखंडाच्या बरोबरीनेच आम्रखंड, ड्रायफूट श्रीखंड, स्ट्रॉबेरी श्रीखंड आदींना खवय्यांची विशेष पसंती असल्याचे दिसून येत आहे. तसेच श्रीखंडानंतर बासुंदी, जिलेबी, काजूकतली, पेढे, गुलाबजाम या पदार्थाना नागरिक पसंती देत असून ६० ते ९० रुपये पाव किलो दराने हे सगळे पदार्थ मिठाईच्या दुकानांमध्ये मिळत आहेत.