मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून राजधानी एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबेही जोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते सिकंदराबाद आणि हावडा (संत्रागाची) दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून सिकंदराबादसाठी २ ते ३१ डिसेंबर दरम्यान विशेष गाडीच्या १० फे ऱ्या चालविण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी सकाळी ११.०५ वाजता विशेष गाडी सुटेल आणि सिकंदराबादहून दर रविवारी सुटणारी विशेष गाडी सोमवारी मुंबईत ११.०५ वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून संत्रागाची (हावडा) साठी २ ते १८ डिसेंबर दरम्यान विशेष सहा फे ऱ्या चालविल्या जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ४, ११ आणि १८ डिसेंबर रोजी सकाळी ११.२५ वाजता गाडी सुटेल आणि संत्रागाची येथून २, ९ आणि १६ डिसेंबर रोजी मुंबईकडे गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान चालविण्यात येत असलेली सुपरफास्ट विशेष गाडी २ ते १३ डिसेंबर दरम्यान दर रविवार आणि बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि दिल्लीला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. दिल्ली येथून दर सोमवार आणि गुरुवारी रात्री ११.४० वाजता ही गाडी सुटून  मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.१५ वाजता पोहोचणार आहे.
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला या महिन्यासाठी दोन जादा डबे जोडण्यात येणार आहेत. वातानुकूलित टू टायर आणि थ्री टायर डबे जोडण्यात येणार असून राजधानीच्या डब्यांची संख्या २० इतकी झाली आहे.