सामाजिक न्याय विभागाच्या अख्यत्यारीतील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या १८ जुलैपर्यंत मान्य न झाल्यास २१ जुलैपासून सातारा जिल्ह्यात बेमुदत उपोषण तसेच कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सत्याग्रह सुरू करण्याचे ‘महाराष्ट्र असोशिएशन ऑफ सोशलवर्क एज्युकेटर्स’ (मास्वे)तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून १२०० एवढीच संख्या असतानाही त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार देय थकबाकी देण्यात आलेली नाही. संस्थेतील ग्रंथपालांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. यामुळे कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये असंतोष असल्याचे मास्वेचे अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
* मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यात यावे.
* ग्रंथपालांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा.
दरमहा नियमित व वेळेवर वेतन व्हावे.
* शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १/१/२००६ ते ३१/३/२०१० या कालावधीची थकबाकी मिळणे.
* शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे केंद्र सरकार द्यावयास तयार असलेली ८० टक्के व राज्यशासनाकडे देय असलेली २० टक्के थकबाकी देण्यात यावी.
* सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ६२ वष्रे करावे.