मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या गुंडांना आवरावे, अन्यथा मोठया संघर्षाची परिस्थीती निर्माण होईल, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. पनवेलमध्ये मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर भाजपाच्या नगरसेवकाकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या नांदगावकर यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. जाधव यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी प्रामाणिकपणे योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. हल्लेखोर भाजपाच्या नगरसेवकाला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणताही प्रयत्न करु नये, अन्यथा मनसैनिक हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळतील आणि असे झाल्यास मोठा संघर्ष होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा थेट इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.