काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले; ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी मोठेपण मिळवल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून नेहमी सांगण्यात येते. पतंगराव कदम गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यासाठी त्यांना ३ मार्च रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आजच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली होती. पतंगरावांच्या निधनाने काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पतंगरावांच्या निधनाने एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजीक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यासारख्या एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. सहकार क्षेत्राची बांधणी करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते आणि ते सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकीय यांच्या दु:खात मी सहभागी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरा लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

अंत्यविधीचा कार्यक्रम :

डॉ. पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवारी म्हणजेच आज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी (सिंहगड बंगला) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भारती विद्यापीठ या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत ठेवण्यात येईल. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना येथे दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय : 

  • १९४५ मध्ये सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म झाला.
  • पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात वने, मदत आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सहकार, शिक्षण क्षेत्रात ते नेहमीच अग्रेसर राहिले.
  • विधानसभेवर ते सहा वेळा निवडून आले होते.
  • १९६४ साली वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
  • भारती विद्यापीठाचे ते संस्थापक-कुलपती होते. ‘भारती विद्यापीठ’ युनिव्हर्सिटी, पुणे या त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या देश आणि परदेशामध्ये १८० शाखा असून ही भारतातील नामवंत आणि अग्रेसर संस्थांपैकी एक मानली जाते.
  • सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी आणि कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि. सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे ते संस्थापक आहेत.
  • नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक व्यवस्थापन महाविद्यालये देखील स्थापन केली आहेत.
  • त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी त्यांना सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल ‘मानवता सेवा अवॉर्ड’ने गौरविले होते. तसेच मराठा सेवा संघाकडून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबद्दल ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’ तसेच शहाजीराव पुरस्कार, कोल्हापुरातील उद्योग भूषण पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.