प्रेमभंगामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या तरुणाने ठाण्यातील एका लॉजमध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. चंदनकुमार प्रसाद (२६) असे या तरुणाचे नाव असून तो झारखंडमधील राहणारा होता. चंदनच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये प्रेमभंग झाल्याचा उल्लेख आहे.
झारखंडमध्ये राहणाऱ्या चंदनचा काही महिन्यांपुर्वी प्रेमभंग झाला होता. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याच्यावर पुण्यात औषधोपचार करण्यात येत होते. दोन दिवसांपुर्वी तो कामानिमित्ताने ठाण्यात आला होता. सोमवारी रात्री झोपण्याच्या पूर्वी त्याने झोपेच्या आणि सुरू असलेल्या औषधांच्या गोळ्या अधिक प्रमाणात प्रशान करून आत्महत्या केली. त्याच्या अगोदर पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न देखील त्याने केला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळ्यांची मात्रा जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मंगळवारी सकाळी लॉजचे वेटर खोली साफ करण्यासाठी गेले असता चंदन मृत अवस्थेत सापडला. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.