वाघ किंवा बिबटय़ाच्या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई तर जखमींना एक लाख रुपये भरपाई दिली जाईल. कायमचे अपंगत्व आलेल्यांना चार लाख रुपये नुकसानभरपाई दिले जाईल, असे प्रतिपादन वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत केले.
चंद्रपूर जिल्ह्य़ात आडेगाव व चोरगाव येथे ११ एप्रिल रोजी वाघाने ग्रामस्थांवर हल्ला केला. चोरगावला १२ एप्रिलला एका मुलीला ठार मारले व तिच्या आईला जखमी केले.
१ एप्रिलपासून नवीन शासन निर्णय लागू झाला असला तरी तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे १ जानेवारीपासून लागू होईल. मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये रोख आणि चार लाख रुपये मुदतठेवीच्या स्वरूपात दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.