मुंबई : भारतीय राज्यघटनेने सर्वाना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, त्यात कुणी अडथळे आणून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. काही लोक मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुढे करून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल. भाजपकडून वापर कोणी राज्यात अशांतता निर्माण करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. राज्यात धार्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा विचार करावा. केंद्रातील मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजप राज ठाकरे यांचा वापर करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.