मुंबई : मुंबईतील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या, पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा येत्या २ मार्चपासून पूर्णवेळ व पूर्ण क्षमतेने प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मुंबईतील करोनाचा कमी झालेला प्रभाव आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा शाळा गजबजणार आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराचेही रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या. पालकांकडून संमतिपत्र घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. तसेच जे पालक आपल्या पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरीता दृकश्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र मुंबईतील करोनाचा संसर्ग पूर्णपणे ओसरत असल्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च २०२० मध्ये करोनाचा संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या शाळा दोन वर्षांनी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. यावेळी अपंगांच्या व विशेष मुलांच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहव्याधी असलेल्या विद्यार्थ्यांना संमतीपत्र आवश्यक ज्या विद्यार्थ्यांना सहव्याधी किंवा गंभीर आजार असतील अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांना सर्दी, घसादुखी अशी करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असेही या नियमात म्हटले आहे. तापमानाची तपासणी, आहारास परवानगी शाळा सुरू करताना पालिका आयुक्तांनी काही नियम घालून दिले आहेत. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासावे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के आवश्यक आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण असावे. करोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या तासांमध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घ्यावेत व विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी व्हावे. मैदानी खेळ व कवायतींच्यावेळी मुखपट्टी बंधनकारक नाही. वर्गात, शाळेच्या बसमध्ये, शालेय परिसरात मुखपट्टी बंधनकारक आहे. शाळेत मधली सुट्टी असेल व मधल्या सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल. विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्ये शिबिरांचे आयोजन करावे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याकरीता खासगी बससेवा व बेस्ट बसमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.