लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. ही कारवाई नोव्हेंबर २०२३ पासून तीव्र करण्यात आली होती. मात्र मार्चपासून ही कारवाई थंडावल्याचे निदर्शनास आले आहे.आरटीओची वाहन तपासणी दर महिना सरासरी साधारणपणे ४ हजाराने घटल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आरटीओने केलेल्या तपासणीत केवळ १४ टक्के वाहने प्रदूषणकारी असल्याचे आढळून आले असून आरटीओच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबईतील वाढते हवा प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी आरटीओने धूर सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मुंबई महानगरातील बोरिवली, मुंबई मध्य, मुंबई पश्चिम, मुंबई पूर्व, ठाणे, कल्याण, पेण, पनवेल, वसई या नऊ आरटीओतील प्रदूषण नियंत्रण पथके / वायुवेग पथकामार्फत सीमा तपासणी नाका येथे ८ नोव्हेंबरपासून वाहनांची पीयूसी तपासणी, नियमभंग करून बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू केले. आरटीओच्या नऊ विभागांनी या मोहिमेअंतर्गत ८ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीत ३० हजार ७८१ वाहनांची तपासणी केली. यापैकी केवळ ४ हजार ३५८ वाहने दोषी आढळली. मुंबईमध्ये दररोज हवेत काळा धूर सोडणारी हजारो वाहने दिसतात. मात्र आरटीओला पाच महिन्यांत फक्त १४ टक्के वाहने दोषी आढळल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आणखी वाचा-मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

विशेष तपासणी मोहीम ८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर १५ दिवसांत साधारण आठ हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार २०० हून अधिक दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. ८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत एकूण १० हजार ०९९ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक हजार ६७९ वाहने दोषी आढळली. १४ जानेवारीपर्यंत एकूण १९ हजार २८७ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ०१८ वाहने दोषी आढळली. तर नोव्हेंबर मार्च या पाच महिन्यांत सुमारे ३० हजार ७८१ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ हजार ३५८ दोषी वाहनांवर कारवाई केली. त्यामुळे वाहन तपासणीमध्ये दर महिना सरासरी चार हजाराने घट झाल्याचे दिसून येत आहे.

वाळू, सिमेंट, खडी, रेतीची वाहतूक करणारी वाहने ताडपत्रीने झाकण्यात येत नाहीत. आरटीओची मोहीम सुरू झाल्यानंतर १५ दिवसांत ७०० वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यांत अवघ्या ९६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून ही कारवाई थंड झाल्याची टीका होऊ लागली आहे.