मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या विचाराने हा देश मार्गक्रण करत असून गांधी विचार जगाने स्वीकारला आहे. गांधींची अहिंसेची शिकवण हीच देशाला तारणारी आहे. मात्र मागील ७ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून गांधी विचार पद्धतशीरपणे संपवण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ३० जानेवारीला कार्यक्रम करणार असून मंत्रालयासमोरील गांधी पुतळय़ासमोर सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्यात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यभर एक संदेश जावा यासाठी एक कार्यक्रम ३० जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर गांधीचे विचार, अहिंसेची शिकवण, राष्ट्रीय एकात्मतेची आठवण व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन गांधींचे स्मरण करावे. मंत्रालयासमोरील गांधी पुतळय़ासमोर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पटोले यांनी केले आहे. ३० जानेवारी हा अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. गांधी विचार ही काळाची गरज आहे. हा विचारच देशाला तारणारा आहे. परंतु तो विचारच संपवण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे, असे नाना पटोले म्हणाले. ‘चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा’ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणारा चित्रपट व्हाय आय किल्ड गांधी? प्रदर्शित होत आहे. गोडसेला हिरो करण्याचे काम केले जात आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही. हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पंतप्रधान मोदी यांच्याकडेही पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. असे पटोले यांनी सांगितले.