महिला पदाधिकाऱ्याने भाजयुमोचा तत्कालीन अध्यक्ष गणेश पांडे याच्यावर विनयभंगाबाबत केलेल्या आरोपांचे पत्र सोशल मीडियामधून प्रसिद्ध झाल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. राष्ट्रवादीने या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून, पांडे याला कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल केला आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये झालेल्या प्रकाराबाबत महिला पदाधिकाऱ्याने मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांना लिहिलेले तीन पानी पत्र सोशल मीडियात प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात त्या पदाधिकाऱ्याने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. पांडे याची चौकशी करून त्याला अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. एरव्ही काँग्रेसच्या नावे बोटे मोडणाऱ्या भाजपमधीलच लैंगिक शोषणाचा प्रकार उघड झाल्याने भाजपची अवस्था फारच बिकट झाली. त्या पत्रावरून भूमिका घेताना भाजपची पंचाईत होत आहे. पांडे याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई पोलिसांकडे सोमवारी केली.