आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केली हे अत्यंत निंदनीय असल्याची टीका भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिले आहे. नितेश ठाकरे यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्विन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला," असा टोला यावेळी त्यांनी पत्रातून लगावला आहे. "महापालिकेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ हजार ५७ हजार ०५९ होती. पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आली आहे. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे. मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्याने नाही," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. "एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलंत. पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतःकरु शकतात तर पेंग्विनची का नाही ? हा पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी?," असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. Love for Penguins.. and Mumbaikar ? @BJP4Maharashtra @MCGM_BMC @MayorMumbai pic.twitter.com/vBKDAQhcJe — nitesh rane (@NiteshNRane) September 16, 2021 "राणीची बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्विन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले. इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला. पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत, मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा," असंही नितेश राणे म्हणाले आहेत.