सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर आता राज्यातही असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार शहरातील निवासी भागात फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यादृष्टीने या भागांमध्ये परवान्यांचे वाटपच करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबाजवणी करा, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे रहिवासी भागात फटाके विक्री करण्यावर बंदी येणार आहे. तसेच ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार प्रशासनाकडून मुंबईत केवळ ८७ परवानाधारक फटाके विक्रेते आहेत. यापैकी कायमस्वरूपी फटाक्यांचा व्यवसाय करणाऱ्या परवान्यांची संख्या ६२ इतकी आहे, तर दिवाळीच्या काळात देण्यात येणाऱ्या परवान्यांची संख्या २५ इतकी आहे. परंतु, या परवान्यांची संख्याही निम्म्याने कमी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.