मुंबईतील महाविद्यालयीन विश्वासह सर्वानाच हादरवून टाकणाऱ्या चेतना महाविद्यालयातील मुलीवरील हल्ल्याप्रकरणी तपासाने वेग घेतला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यातील पीडित पायल बलसारा हिची प्रकृती आता स्थिर असल्याचा निर्वाळा गुरुनानक रुग्णालयातील डॉ. शर्मा यांनी दिला. पायलची प्रकृती स्थिर असली, तरी तिच्यावर अनेक वार झाले असल्याने धोका टळला नसल्याचेही त्यांनी सांगितले. आता या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरण तपासणार असून प्रत्यक्षदर्शी आणि निखील बनकर या आरोपीचे पालक यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात शिकणाऱ्या पायल बलसारा हिच्यावर निखिल बनकर याचे एकतर्फी प्रेम होते. ते दोघे चांगले मित्र होते. निखिलने वारंवार प्रेमाबद्दल विचारणा केल्यानंतर पायलने आपल्या मामाला त्याबद्दल सांगितले होते. मामाने पोलिसांत तसेच महाविद्यालयात तक्रारही नोंदवली होती. या प्रकरणी निखिलच्या आईवडिलांनाही समज देण्यात आली होती. मात्र शनिवारी निखिलने महाविद्यालयातच पायलला अडवण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच निखिलने आपल्याजवळील चाकूने तिच्या छातीवर, मानेवर, पोटावर, गळ्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात पायल जबर जखमी झाली. महाविद्यालयातील कर्मचारी निखिलला पकडण्यासाठी पुढे सरसावल्यावर त्याने स्वतवरही चाकूने हल्ला केला. या दोघांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पायलच्या जखमांमधून भरपूर रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. पायलवर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तपास पुढे नेण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरणाचा आधार घेण्याचे नक्की केले आहे.