राज्यातील ठाकरे सरकारला लवकरच १०० दिवस पूर्ण होणार आहे. यासदंर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. शेतकरी कर्जमाफी हा आपल्या सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी बोलताना दिली. तसंच शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि संयमाबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री पदी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि संयम सोडला नाही. त्यामुळेच ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण होत आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच डिसेंबरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. पहिली यादी आणि दुसरी यादी यापूर्वी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहेय. सर्व ठिकाणी व्यवस्थित काम सुरू आहे. लवकर ही योजना पूर्ण केली जाईल, असंही ते म्हणाले.

७ मार्चला अयोध्या दौरा
येत्या ७ मार्चला आपण अयोध्येला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. देवाचं दर्शन करण्यात काय राजकारण आहे. देव हा देव असतो यात कोणतंही राजकारण नाही. मी अयोध्येला जाणारचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

एनपीआरसाठी समिती
एनपीआर आणि एनआरसी संबंधी तीन पक्षांसह मित्रपक्षांच्या सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. एनपीआरमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे तपासून ही समिती तपासून पाहणार आहे. कोणत्याही नागरिकाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

सामनाच्या संपदकीय विभागाची जबाबदारी राऊतांकडेच
“सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्याकडं देण्यात आली आहे. मात्र, संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. संपादक बदलल्यानंतर सामनाची भाषा आणि दिशा बदलेल असं बोललं जात आहे. पण, सामनाची भाषा आहे तशीच राहिल. सामनाची भाषा ही पितृभाषा आहे. बाळासाहेबांकडून आलेली आहे. त्यामुळे सामनाची भाषा आणि दिशा कधीच बदलणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव नाही
सरकारसमोर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आला नाही. त्याबाबत कोणतीही आदळआपट करण्याची गरज नाही. मुद्दा सरकारसमोर आल्यावर कागदपत्र तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. शिवसेनेनं अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही वक्तव्य केलं. मराठा आरक्षणावर सरकार ताकदीनं लढत असल्याचं ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray speaks about important decision taken in 100 days jud
First published on: 03-03-2020 at 13:13 IST