कमाल तापमानात ६.५ अंश से. घट मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरात उकाडा जाणवत असताना बुधवारी अचानक कमाल तापमानात जवळपास सहा अंश से. घट झाली आहे. समुद्र किनाऱ्यावरील वारे वायव्यकडे वाहत असल्याने तापमान कमी झाल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. तापमानाच्या चढ उतारामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे याबाबत शंका उपस्थित होत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात शक्यतो तापमान कमी असते. असे असताना मात्र गेल्या सोमवारी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश से. पोहचला होता. मंगळवारी पुन्हा तापमानात घट झाल्याचे दिसले. बुधवारी मात्र कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली येऊन ६.५ अंश से. घट झाल्याचे हवामानखात्याकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी उकाडा जाणवत असताना मात्र संध्याकाळी हवेत गारवा जाणवत होता. बुधवारी सांताक्रुझ येथे २८.८ आणि कुलाबा येथे २९.२ कमाल तापमानाची नोंद झाली आहे.