मुंबई : अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून देशव्यापी भारत जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात वेगवेगळय़ा भागांत १६ दिवस पदयात्रा काढून व जाहीर सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर चिंतन शिबिरात भाजपच्या धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याच्या व सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधी जयंतीपासून म्हणजे २ ऑक्टोबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर असे भारत जोडो अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्याची सध्या तयारी सुरू आहे. या अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून महाराष्ट्रातील समन्वयाची जबाबदारी माजी महसूलमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अभियानाच्या दरम्यान राहुल गांधी १६ दिवस महाराष्ट्रात थांबणार आहेत. सात लोकसभा मतदारसंघ व १५ विधानसभा मतदारसंघातून ते पदयात्रा काढणार असून त्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर १० शहरांमध्ये त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.