अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणला. ते ४० हून अधिक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हे होणारच होतं, अशी प्रतिक्रिया दिली. सचिन सावंत म्हणाले, "हे होणारच होतं! आता निवडणुका झाल्या तर कर्नाटकसारखे बहुमत मविआला मिळेल हे स्पष्ट होते. पक्ष फोडण्याशिवाय भाजपाकडे पर्यायच नव्हता. अमेरिकेत १४ वेळा लोकशाही म्हणणाऱ्या मोदींचा खरा चेहरा तो हाच!" "नुकतेच ज्यांना भ्रष्टाचारी म्हटले ते आता त्यांच्या बाजूला बसतील. पण काहीही करा यंदा भाजपा आपटणारच," असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला. नेमकं काय घडलं? अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. हेही वाचा : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवार दबावतंत्राचा वापर करत आहेत का? शरद पवार म्हणाले… विशेष म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे राष्ट्रवादीतील दिग्गज नेतेही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.