मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आर्जव मुंबई: अनेकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येत असतात. या शहरात हक्काच घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळेच संघर्ष करून मिळविलेले घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईकरांना केले. गोरेगाव येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. कित्येक वर्षांपासून रखडलेला पत्राचाळ हा विषय अनेकांच्या माहितीचा आहे. गेली अनेक अनेक वर्षे त्याचे दळण दळले, आंदोलने झाली पण प्रश्न सुटला नाही. मात्र वर्षभरापूर्वी संघर्ष समिती भेटायला आल्यानंतर त्यांना हा प्रश्न सोडवण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करत आहोत. अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत आहे. पण या घरासाठी संघर्ष करणारी काही लोक हा क्षण पहायला हयात देखील नाहीत असे प्रारंभीच स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, कामं अनेक असतात, योजना अनेक असतात, अडचणी डोंगराएवढय़ा असतात पण एखादी अडचण दूर करायची म्हटली तर ती दूर करून काम करता येते याचे पत्राचाळ हे उत्तम उदाहरण असून या प्रकल्प मार्गी लागावा, लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी सुभाष देसाई आणि आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे कौतूकही त्यांनी केले. या प्रकल्पाचे काम आता सुरू झाले असून सर्वाना लवकरच घर सुद्धा मिळतील. त्यामुळे हक्काची घर मिळायला जो संघर्ष केला तो संघर्ष विसरू नका. सरकार किंवा म्हाडाच्या माध्यमातून हे घर मिळाल्यानंतर ते विकून हा संघर्ष वाया जाऊ देऊ नका. या घरांसाठी संघर्ष करता, करता, घरांच स्वप्न पाहता-पाहता अनेकजण आपल्यातून निघूनही गेले. या घरात पाऊल टाकताना त्यांची आठवण ठेवा आणि कृपा करून मिळालेली ही घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका असे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले. तसेच घर मिळाल्यानंतर एकदा चहा प्यायला बोलवा अशी मिश्किल सूचनाही केली. मुंबईत पुनर्वसनाचे अनेक प्रकल्प रख़डल्यामुळे हजारो लोक हक्काच्या घरापासून वंचित आहेत. त्यामुळे म्हाडाने हे रखडलेले प्रकल्प ताब्यात घेऊन ते पूर्ण करावेत.त्यामुळे लोकांना हक्काचे घर मिळेल, अशी सूचना शरद पवार यांनी केली.