मुंबई : दोन वर्षे निर्बंधांमुळे आटलेला कोकणातील शिमगोत्सवाचा उत्साह यंदा शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अद्यापही एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याचा फायदा उचलून खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी दुप्पट ते तिप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी दीड ते तीन हजार रुपये भाडे आकारले जात आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने अतिरिक्त गाडय़ा सोडल्या असल्या तरी त्याही आता आरक्षित असून तेथे प्रतीक्षा यादी आहे. मुंबई ते सावंतवाडी शयनयान (स्लीपर)वातानुकूलित खासगी बसचे भाडे १७ मार्चपासून तीन हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. तर विनावातानुकूलित आसनाचे भाडे दीड हजार ते १,६०० रुपयांपर्यंत आहे. गर्दीचा काळ सोडल्यास या मार्गावर वातानुकूलित शयनयानाचे भाडे प्रतिप्रवासी १,२०० ते १,४०० रुपये आणि विनावातानुकूलित आसनाचे दर ८०० रुपयांपर्यंत असतात. खासगी वाहतुकदारांनी मुंबई ते रत्नागिरी विनावातानुकूलितचे भाडे १,२०० रुपये आणि शयनयान वातानुकूलितचे तिकीट दर १,८०० रुपये निश्चित केले आहेत. एसटीच्या मुंबई ते रत्नागिरी-साध्या बसचे भाडे ५२५ रुपये आणि शिवशाहीचे ७१० रुपय आहे. मुंबई ते सावंतवाडी साधी बस ७६० रुपये आणि शिवशाही १,३० रुपये, मुंबई ते चिपळूण- साधी बस ३९० रुपये आणि शिवशाही ५३५ रुपये, असे भाडे आहे. सध्या सेवेत असलेल्या एसटीच्या चालक, वाहकांची संख्या कमी आहे. तरीही उत्पन्नासाठी आहे त्या मनुष्यबळात आणि होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई, ठाणे, रायगडमधून नियमित गाडय़ांबरोबरच जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी कार्यरत चालक, वाहकांना अतिरिक्त वेळ (डबल डय़ुटी) काम देण्यात आली असून त्यांच्यावरही कामाचा ताण पडला आहे. गर्दीच्या काळात शासनाने एसटी भाडेदराच्या दीडपट भाडे आकारण्याची मुभा दिली आहे. त्यानुसारच सध्या भाडेदर आकारले जात आहेत. मागणीनुसार विमानाचे भाडे दर वाढतात, त्यावर शासनाचे नियंत्रण का नाही, मग हा प्रश्न खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनाच का विचारला जातो? - हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना