उपनगरी गाडीतील गर्दीमुळे कांदवली येथील विजयकुमार वर्मा या १९ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी मीरा रोड येथून परतताना त्याचा मृत्यू झाला.कांदिवलीच्या रहमान मशीद अमन सेवा सोसायटीमध्ये राहणारा विजयकुमार जटाशंकर वर्मा हा आपल्या काही मित्रासमवेत मीरा रोड येथील आपल्या मित्रांना भेटायला गेला होता. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्या सर्वांनी चर्चगेटला जाणारी गाडी पकडली. गाडीला गर्दी असल्यामुळे विजय आणि त्याच्या मित्रांनी वेगवेगळ्या डब्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याचे मित्र आत शिरले आणि विजय एकटाच दुसऱ्या डब्याच्या दरवाजात बाहेर उभा होता. गर्दीमुळे त्याला आत जाता येत नव्हते. गाडीने मीरा रोड स्थानक सोडले आणि त्याचा हात सुटून तो खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. विजयचा मृत्यू झाल्याचे त्याच्या मित्रांनाही माहीत नव्हते. त्याला गाडी मिळाली नसेल असे वाटून त्यांनी त्याला मोबाइलवर फोनही केले. त्याच्या घरच्यांनी आणि मित्रांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. अखेर सकाळी वसई रेल्वे पोलीसांकडे हरविल्याची तक्रार करण्यास गेलेल्या विजयच्या मित्रांना मीरा रोड येथे एक अनोळखी तरूणाचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. तो विजयचाच मृतदेह असल्याची ओळख त्याच्या मित्रांनी पटवली. विजयचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी
उपनगरी गाडीतील गर्दीमुळे कांदवली येथील विजयकुमार वर्मा या १९ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी मीरा रोड येथून परतताना त्याचा मृत्यू झाला.
First published on: 26-11-2012 at 02:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death due to passengers falling off running local trains