मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना ८ व ९ मार्चला चंद्रपूरला जायची आणि वृद्ध आईची भेट घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. मात्र न्यायालयाने घातलेल्या अटींबाबत तेलतुंबडे नाखुश असल्याने आणि आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा त्यांचा मानस असल्याने ते कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेच नाहीत, असे राज्य सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) बुधवारी उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. तर मणक्यावरील शस्त्रक्रियेमुळे प्रवास टाळल्याचा दावा तेलतुंबडे यांच्यातर्फे करण्यात आला. न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या खंडपीठासमोर तेलतुंबडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी तेलतुंबडे यांनी तळोजा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा त्यांचा मानस असल्याचे कळवले आहे, असेही सरकारी वकील संगीता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच यातूनच तेलतुंबडे यांची वृत्ती दिसून येत असल्याचेही न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. कारागृह अधीक्षकांना तेलतुंबडे यांनी लिहिलेले पत्रही त्यांनी मोहोरबंद पाकिटात न्यायालयाला दिले. त्यावर आपण स्वत: तेलतुंबडे यांच्याशी बोललो आणि त्यांचा उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा कोणताही मानस नाही, असे तेलतुंबडे यांचे वकील मिहिर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. शिवाय जेजे रुग्णालयात तेलतुंबडे यांच्यावर नुकतीच मणक्याची शस्त्रक्रिया झाल्याचे आणि त्यामुळेच त्यांनी लांब पल्ल्याच्या गाडीतून जाणे टाळले. त्यांना विमान प्रवास करायचा होता. परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना बळजबरीने नेले जाईल, अशी भीती त्यांना होती, असेही देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रावर तेलतुंबडे यांची स्वाक्षरी असून त्यांनी त्यात आदेशाला आव्हान देण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.