दुष्काळाची झळ जनतेला बसू लागली आहे. पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू किंवा अन्य काही विदारक झाल्यास त्याचे पडसाद नुसतेच राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटण्याची शक्यता आहे. विदेशी वृत्तवाहिन्या त्याचे चित्रिकरण करतील आणि जागतिक पातळीवर महाराष्ट्राची बेअब्रू होऊ शकते, असे सांगत दुष्काळ निवारणासाठी योग्य समन्वय आणि नियोजन करावे, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत खासदारांच्या बैठकीत सविस्तर निवेदन करताना पवार यांनी दुष्काळग्रस्तांना योग्य मदत मिळेल, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. सरकारने वेळीच त्यात लक्ष घालावे. पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर चारा छावण्या सुरू झाल्या. मराठवाडय़ातही अधिक छावण्या सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
दुष्काळी भागातील नेतेमंडळींच्या दौऱ्यांबद्दल टीका सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी टीका केली असली तरी शरद पवार यांनी दौऱ्यांचे समर्थन केले. मात्र, दुष्काळी निवारणाकरिता लोकांना मदत मिळावी. यंत्रणा नेतेमंडळींच्या दौऱ्यात अडकून पडू नये या उद्देशाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जास्त दौरे करण्याचे टाळण्याचे ठरविले आहे.
गुजरातचे अनुकरण करा
दुधाच्या क्षेत्रात गुजरातचे अनुकरण महाराष्ट्राने करावे, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. बाहेरच्या राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्र कुठे आहे, असा सवाल पवार यांनी केला. गुजरातमध्ये ‘अमुल’ हा एकच बॅ्रँण्ड विकसित करण्यात आला. राज्यातही असाच विचार करण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले. ‘महानंद’चा कारभार सुधारा, असा कानमंत्र देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या महानंदच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.